कराड : कराड येथील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक मोहन कुलकर्णी (वय ७०) यांचे आज पहाटे कराड येथे कोरोनाने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या निधनाने एक चारित्र्यसंपन्न, ध्येयवादी, उपक्रमशील व व्रतस्थ पत्रकार गमावल्याची भावना सर्व क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
मूळचे पाटण तालुक्यातील सांगवडचे असलेल्या मोहन कुलकर्णी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर जिद्द, चिकाटीने मात करून आपले व्यक्तिमत्व घडवले होते. अत्यंत सुस्वभावी, संवेदनशील व निर्भिड पत्रकार म्हणून सर्वत्र त्यांची ओळख होती. अभ्यासपूर्ण व सडेतोड लेखन हे त्यांच्या पत्रकारितेचे खास वैशिष्ट्य होते. त्यांचे लेख तरुण भारत, विशाल सह्याद्री, लोकमान्य, समाज , ऐक्य, सकाळ, ग्रामोध्दार अशा विविध दैनिकात तर समर्थ, रथचक्र, रसरंग, लोकप्रभा, साधना, स्वराज्य अशा साप्ताहिकातुन प्रसिद्ध झाले आहेत. पुढे त्यांची इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, तरुण भारतचे कराडचे वार्ताहर म्हणून नेमणूक झाली. पुढारीचे कराडचे ब्युरो चिफ म्हणूनही त्यांनी प्रदीर्घकाळ काम केले होते. तडाखेबंद लेखणीद्वारे त्यांनी एक काळ गाजवला होता.
कला सुगंध साहित्य संघ यासह विविध साहित्य, सांस्कृतिक संस्थांची त्यांनी स्थापना केली व त्या माध्यमातून अखेरपर्यंत अनेक उपक्रम त्यांनी राबवले. चौफेर या संस्थेच्या माध्यमातून आनंद परांजपे यांच्यासमवेत मोहन कुलकर्णी यांनी अनेक साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय चर्चासत्रांचे कार्यक्रम कराडला घेतले. १९८५ साली बिहार सरकारने पत्रकारितेवर घाला घालणारा काळा कायदा संमत केला त्यावेळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात ते सहभागी होते. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने त्यांना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित केले होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
आजच्या ताज्या बातम्या - https://sataraupdates.blogspot.com/search/label/live%20updates?&max-results=5

0 टिप्पण्या