Satara News : सातारा जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जारी


संचारबंदीतून महामार्गाला सूट; मंगल कार्यालयांवर राहणार करडी नजर

Satara News : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सातारा जिल्ह्यातही काही प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सातारा जिल्ह्यात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आयोजित कोरोना संसर्गाबाबतच्या आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह (ऑनलाईन), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

पॉझिटिव्ह रेट १७.०२ टक्के

१ फेब्रुवारीपासून जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १७.०२ टक्के असा असून बरे होण्याचे प्रमाण ९५.१५ टक्के आहे, असे सांगून पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, महामार्गांवर असलेली हॉटेल, रेस्टॉरंट वगळून इतर हॉटेल, रेस्टॉरंट रात्री ११ नंतर बंद ठेवण्यात यावी. लग्न समारंभाला वधूकडील ५० आणि वराकडील ५० अशा १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात येत आहे. पण काही ठिकाणी याचे उल्लंघन होत आहे, असे आढळल्यास संबंधित कार्यालय व लग्न कार्यासाठी नोंदणी करणार्‍यावर कारवाई करावी.
राज्यासह जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने १०० टक्के मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. आज बाजारांमध्ये कुठेही सुरक्षित अंतर पाळले जात नाही. तरी ज्या ठिकाणी बाजार भरतो त्या ठिकाणी संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी विक्रेते यांच्यासाठी अंतर राखून जागा उपलब्ध करुन द्यावी जेणे करुन विक्रेता व ग्राहक यांच्यात सुरक्षित अंतर राहिले पाहिजे.
महाविद्यालय, शाळा सुरु झाल्या आहेत. महाविद्यालयाचे व्यवस्थापन व शाळांचे संस्थाचालक शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करतात की नाही याची पोलीस विभाग व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संयुक्तपणे अचानक महाविद्यालय व शाळांना भेटी देवून तपासणी करावी. कोणी अंमलबजावणी करत नसल्यास कारवाई करावी. जिल्ह्यात ७१ टक्के लसीकरण झाले आहे. परंतु यामध्ये खासगी डॉक्टर व त्यांचे कर्मचारी लस घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही सुरक्षित असून खासगी डॉक्टर व त्यांच्या कर्मचार्‍यांनी घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

कोरोना चाचणी न केल्यास होणार गुन्हा दाखल

कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात वाढत आहे. एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आला तर त्याच्या संपर्कात आलेले लोक कोरोनाची तपासणी करुन घेत नाहीत, असे काही तालुक्यांमध्ये निदर्शनास आले आहे. असे आढळल्यास प्रशासनाकडून संबंधितावर गुन्हा दाखल करावा, असे आदेशही पालकमंत्री पाटील यांनी या बैठकीत दिले.

मास्क, सुरक्षित अंतर न पाळणार्‍यावर गुन्हे दाखल करा

मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुण्याने कोरोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन करणार्‍यावर पोलिसांनी कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

राजकीय, सामाजिक मेळावे, यात्रा - जत्रांवर बंदी

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये याकरिता कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक मेळाव्यांना, यात्रा व जत्रांना (कमीत कमी लोकात धार्मिक विधी करता येईल) निर्बंध असतील. आठवडाभरानंतर परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येतील, असे सूतोवाचही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या